मुंबई: मी सांगतो शांत राहा, म्हणून हे सगळे शांत आहेत. जोपर्यंत शांत आहेत, तोपर्यंत त्यांना शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका. जर शिवसैनिकावर अन्याय कराल, तर तो आम्ही सहन करणार नाही. तुमचा कायदा तुमच्या मांडीवर कुरवाळत बसा असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला दिला. शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2022) ते बोलत होते.
पोलिसांकडून त्या गटात जाण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. हा तुमचा कायदा? एवढंच नाही, तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही धमकी दिली जातेय की त्या गटात जा नाहीतर तुमच्या केसेस काढतो. काय सलून काढलंय तुम्ही केसेस काढण्याचं?
हा तुमचा कायदा असेल तर तो आम्ही जाळून टाकू –
काय कायद्याच्या चौकटीत बोलायचं? मिंधे गटाचे आमदार तिथे गेले. कुणी गोळीबार करतो, कुणी चुन चुन के मारेंगेची भाषा करतो. हा तुमचा कायदा असेल तर तो आम्ही जाळून टाकू. आमच्यापैकी कुणी बोललं, तर त्याला उचलून आत टाकता. तुम्ही कुठल्या पद्धतीने कायदा चालवताय?
देवेंद्र फडणवीसांना कायदा चांगला कळतो. हा टोमणा नाही. त्यांना कायद्यातलं चांगलं कळतं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जाताना बोलून गेले होते की मी पुन्हा येईन. दीड दिवस आले. दिड दिवसात विसर्जन झालं. मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले. मी खरं बोलतोय. मी कुठे टोमणा मारतोय. आता ते म्हणतायत कायद्याच्या चौकटीत बोला, नाहीतर कायदा आपलं काम करेल. देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात. पण आम्हाला सगळ्यांना कायदा कळतो. कायदा सगळ्यांनी पाळायला हवा. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची, हे नाही चालणार.
आनंद दिघेंना जाऊन २० वर्ष होऊन गेली. आजपर्यंत आनंद दिघे आठवले नाहीत. पण आज आठवतायत, कारण आनंद दिघे आता काही बोलू शकणार नाहीत. आनंद दिघे जातानाही भगव्यात गेले. ते एकनिष्ठ होते. त्यांनी भगवा सोडला नाही.
माणसाची हाव किती असते? इतरांना बाजूला सारून तुला आमदार केलं मंत्री केलं, आता मुख्यमंत्री झाला. पण तरी शिवसेनाप्रमुख व्हायचंय यांना. शिवसेनाप्रमुख म्हणून त्याला स्वीकारणार का तुम्ही? आहे का लायकी त्याची? एकतर स्वत:च्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वत:च्या वडिलांचा तरी विचार करायचा. त्यांना वाटेल काय हे दिवटं कार्ट माझ्या पोटी जन्माला आलं जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या बापाचं नाव लावतंय.
आज तुम्ही जे केलं, हेच मी तुम्हाला म्हणत होतो. तेव्हा सांगितलं की संभवही नही. मग आत्ता तुम्ही जे केलं, ते तेव्हाच का नाही केलंत? पण शिवसेना संपवायची म्हणून हे सगळं.
मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा सात जणांमध्ये मी त्याचाही मान राखला होता. तेव्हा माहीत नव्हतं की बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आहे? की बोलताना स्वत:ची दाढी स्वत:च्याच तोंडात जात होती? घेतली होती ना इथेच शपथ? अमित शाह जे बोलले की आमचं असं काही ठरलंच नव्हतं. मी आज शिवरायांच्या साक्षीनं माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की जे मी बोलले, ते तसंच ठरलं होतं. भाजपा आणि शिवसेनेचं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं होतं
…म्हणून मी महाविकास आघाडी केली होती
काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार.. कुणाचा आमदार.. पुन्हा डोळे लावून बसलेत की नातू नगरसेवक होणार. अरे त्याला मोठा तर होऊ दे. पण यांचं सगळं ध्येय काही एकच.. सगळं माझ्याकडेच हवंय. मी मुख्यमंत्री का झालो होतो? भाजपानं पाठीत वार केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती.