मुंबई: नांदेडमध्ये शीख बांधवांच्या होला मोहल्ला Hola-Mohalla या कार्यक्रमात काही समाजकंटकांनी तोडफोड आणि पोलिसांवरील हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता नांदेडचे पालकमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “नांदेडमध्ये झालेला प्रकार हा धक्कादायक आणि दुर्दैवी होता. पोलीस प्रशासन त्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई नक्की करेल”, असं अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
काय झालं नांदेडमध्ये?
शीख बांधवांकडून होळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होला मोहल्ला हा कार्यक्रम केला जातो. यावेळी मात्र त्याला परवानगी देण्यात आली नव्हती. नांदेडमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, तरीदेखील काही गटांनी सोमवारी मिरवणूक काढली. यावेळी शहरात पोलिसांनी घातलेले बॅरिकेड्स देखील तोडून जमावातल्या काही जणांनी थेट पोलिसांवरच हल्ले केले. काहींनी तलवारीने देखील हल्ले केल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा: …अशी परिस्थिती आली तर मुंबईत पुन्हा लॉकडाउन?; पालकमंत्री अस्मल शेख
नांदेडमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे अनेक पोलीस जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तसेच, पोलिसांनी आत्तापर्यंत सुमारे ४०० जणांवर गुन्हा दाखल केले आहेत. या प्रकरणी आत्तापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली आहे.
अशोक चव्हाण सोमवार रात्रीपासून नांदेडमध्येच!
नांदेडचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे या प्रकारानंतर काल रात्रीपासून नांदेडमध्येच तळ ठोकून होते. यासंदर्भात सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषदेत घडल्या प्रकाराची माहिती दिली.
“मिरवणूक काढली जाणार नाही हे ठरलं होतं. मात्र, तरीदेखील काही मंडळींनी बॅरिकेड्स तोडली. बाहेर पडलेल्या काही लोकांनी पोलिसांवर निर्घृण पद्धतीने हल्ले केले. त्यातले काही पोलीस रुग्णालयात दाखल झाले आहेत. कालची घटना अतिशय निंदनीय आणि चुकीची आहे”, असं ते म्हणाले.
“या सर्व प्रकाराची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. ज्या पद्धतीने पोलिसांवर तलवारीने हल्ले झाले, ते भयानक आहे. पालकमंत्री या नात्याने मी काल रात्री नांदेडमध्ये आलो. सकाळी एसपी, आयजी, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. चौकशीअंती जे स्पष्ट होईल, त्यानुसार कारवाई केली जाईल. ही घटना घडणं दुर्दैवी आहे”, असं देखील अशोक चव्हाण यांनी नमूद केलं.