मुंबई : हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान YUSUF KHAN उर्फ दिलीपकुमार Dilip Kumar dies यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.
काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यापासूनच त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
जून महिन्यात दोनदा करण्यात आले होते रुग्णालयात दाखल
दिलीप कुमार यांना श्वसनाच्या त्रासामुळे 29 जून रोजी दुस-यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांना 6 जून रोजी देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हादेखील त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवला होता. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले होते. 9 जून रोजी त्यांच्यावर एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वैद्यकीय भाषेत या शस्त्रक्रियेला ‘प्ल्यूरल एस्पिरेशन’ म्हटले जाते. ही शस्त्रक्रिया मुख्यतः फुफ्फुसात जमा झालेला कफ, श्वास घेण्यास येणाऱ्या अडचणी आणि छातीतील वेदना दूर करण्यासाठी केली जाते. यावेळी सुमारे 350 मिलीलीटर द्रव त्यांच्या फुफ्फुसातून काढून टाकण्यात आला होता. ज्यानंतर दिलीप कुमाराला खूप अशक्तपणा जाणवत होता. या उपचारानंतर त्यांची ऑक्सिजनची पातळी वाढू लागली होती. पाच दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना 11 जून रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.
दिलीप कुमार पद्मभूषण, दादासाहेब पुरस्काराने सन्मानित
दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांनी ‘ज्वार भाटा’ (1944), ‘अंदाज’ (1949), ‘आन’ (1952), ‘देवदास’ (1955), ‘आझाद’ (1955), ‘मुगल-ए-आजम’ (1960), ‘गंगा’ जमुना (1961), ‘क्रांती’ (1981), ‘कर्मा’ (1986) आणि ‘सौदागर’ (1991) यासह 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.
फिल्मफेअरचे 1954 चे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवणारे दिलीप कुमार हे पहिले अभिनेते होते. त्यांना आठ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल 1994 ला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीप कुमार यांना गौरवण्यात आले होते. राष्ट्रपती कोट्यातून 2000-2006 दरम्यान त्यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने 1998 मध्ये त्यांना ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानमधील सर्वात उच्च असे नागरी पारितोषिक देऊन सन्मानित केले होते.
मागील वर्षी कोरोनामुळे दोन भावांचे निधन
मागील वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे कोरोनामुळे निधन झाले होते. 21 ऑगस्ट रोजी 88 वर्षीय अस्लम यांचे तर 2 सप्टेंबर रोजी 90 वर्षीय अहसान यांची कोरोनामुळे प्राणज्योत मालवली होती. यामुळे सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपल्या लग्नाचा 54 वा वाढदिवस साजरा केला नव्हता.
हेही वाचा
…मग वर्षभरापासून राज्यपालांनी 12 आमदारांची दाबलेली यादी लोकशाहीची हत्या नाही का?