मुंबईः राज्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ५१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात एकूण ६२ हजार ९७ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यात झपाट्याने वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता आता कडक लॉकडाऊन करावाच लागेल, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या बुधवारी रात्री ८ वाजेनंतर याबाबतची औपचारिक घोषणा करणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी या बैठकीनंतर दिली.corona-virus-cm-uddhav-thackeray-will-announce-lockdown-tomorrow-news-updates
राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता आता संपूर्ण कडक लॉकडाऊन लावावाच लागेल, असे मत सर्वच मंत्र्यांनी या बैठकीत मांडले. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये कोणत्या गोष्टींवर निर्बंध लावण्यात यावेत, याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या याबाबतची अधिकृत घोषणा करतील, असे परब म्हणाले.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे. राज्यात औषधांचा तुटवडाही जाणवू लागला आहे. मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजनची गरजही भासू लागली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालायचा असेल तर लोकांना एकमेकांच्या जवळ न येऊ देणे हा त्यावरचा पर्याय आहे, असे परब म्हणाले.
कडक निर्बंध लावूनही कोरोना नियंत्रणात येत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जनता रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील निर्णयाबाबत मुख्यमंत्री ठाकरे उद्या, बुधवारी सविस्तर भूमिका मांडतील. त्यानंतर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.
रुग्णसंख्या प्रमाणाबाहेर वाढत आहे. त्यासाठी लागणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांची एक मर्यादा आहे. ते गेले वर्षभर काम करत आहेत. कोरोनाची साखळी तोडायची तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. अत्यावश्यक सेवा लोकांना नक्कीच मिळतील. त्यात कुठेही अडचण येणार नाही. पण त्या कशा मिळतील, याची पद्धत ठरवली जाईल, असे परब म्हणाले.