मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मात्र औरंगाबादमध्ये (Aurangabad) असताना दौरा अर्धवट सोडून दिल्लीला (Delhi) रवाना झाले आहेत. औरंगाबादची सभा आटोपून त्यांनी दिल्लीला प्रयाण केले आहे. एका महिन्यातील त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे.
राज्यात सत्तांतर होऊन साधारण एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच मंत्रिमंडळ विस्तारावर मागील काही दिवासांपासून भाजपाचे दिल्लीमधील वरिष्ठ नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरु आहे. शिंदे महिन्याभरात आतापर्यंत एकूण पाच वेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. असे असताना आजदेखील ते औरंगाबादचा दौरा अर्धवट सोडून ते पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत.
दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातंय. राज्यात सध्या दोन मंत्र्यांचे सरकार आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी मागणी केली जात आहे.