मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत मुंबईतून हिमाचल प्रदेशमधील मनालीला सोमवारी आपल्या घरी पोहोचली. मात्र, तेथे गेल्यानंतर तिला 10 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. (Kangana Ranaut Quarantine in Himachal Pradesh). कंटेनमेंट झोन असलेल्या मंबईतून आल्याने हिमाचल प्रदेश आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून कंगनाला क्वारंटाईन केलं आहे.
कंगनाला पुढील 10 दिवस कोठेही बाहेर जाता येणार नाही. तसेच कुणाला भेटताही येणार नाही. कंगना मुंबईमध्ये पाच दिवस मास्क न लावता फिरत होती. राज्यपालांच्या भेटीदरम्यान कंगना आणि तिच्या बहिणीला मास्क नव्हता. त्यामुळे सोशल मीडियावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
क्वारंटाईन काळातच कंगना रनौतची आठवडाभरानंतर पुन्हा एकदा कोव्हिड 19 चाचणी घेतली जाणार आहे. त्या चाचणीच्या अहवालावरच कंगनावरील निर्बंध शिथिल होणार की आणखी वाढणार हे ठरणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अद्यापही राज्य प्रवेश करण्यासाठी ई-पास सक्ती कायम आहे.