मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात तब्बल ३२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५९ हजार ९०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ५६ हजार ६५२ वर गेला आहे.maharashtra-corona-today-322-deaths-over-59-thousand-new-cases-reported-news-updates
राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंंत राज्यात ३१ लाख ७३ हजार २६१ करोना बाधित सापडले आहेत. त्यापैकी सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख १ हजार ५५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी, २१ हजार २१२ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये राज्यात आज ३० हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत ही दिलासादायक बाब आहे.
हेही वाचा: केंद्राच्या चुकीच्या लसीकरण धोरणामुळे राज्यात कोरोनाचा हाहाकार : अनंत गाडगीळांचा हल्लाबोल
मृतांचा आकडा वाढला असला, तरी एकूण कोरोनाबाधितांची संख्या देखील वेगाने वाढत असल्यामुळे राज्याचा मृत्यू दर अजूनही १.७९ टक्के इतका कमीच असल्याची नोंद झाली आहे.
मुंबईत १० हजार ४२८ नवे रुग्ण सापडले!
दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात १० हजार ४२८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यासोबतच ६ हजार ७ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी देखील परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या एकूण मृतांचा आकडा ११ हजार ८५१ इतका झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ८२ हजार ७६० इतकी झाली आहे.