‘वंचित’चं महाविकास आघाडीला पत्र…”, पत्रात नेमकं काय म्हटलंय?

prakash-ambedkar-vanchit-bahujan-aghadi-ask-mva-lok-sabha-seat-sharing-formula-for-maharashtra-news-update-today
prakash-ambedkar-vanchit-bahujan-aghadi-ask-mva-lok-sabha-seat-sharing-formula-for-maharashtra-news-update-today

मुंबई:लोकसभा-2024 निवडणुकीबाबत महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांच्या सातत्याने बैठका आणि चर्चा होत आहेत. परंतु, मविआ अद्याप जागावाटपाचा निर्णय घेऊ शकलेली नाही. दुसऱ्या बाजूला, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येण्यास इच्छूक आहे. परंतु, वंचितबाबतचा निर्णयही मविआ नेत्यांनी घेतलेला नाही. अशातच वंचित बहुजन आघाडीने मविआ नेत्यांना पत्र लिहून जागावाटपाबाबत निर्णय घेण्यास सुचवलं आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर आणि उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी २२ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पत्र लिहिलं आहे. हे पत्र संजय राऊत, नाना पटोले आणि जयंत पाटील यांच्यासारख्या मविआमधील इतर प्रमुख नेत्यांनाही पाठवण्यात आलं आहे.

वंचित बहुजन आघाडीने या पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या गुरुवारी, २२ फेब्रुवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये ३९ जागांवर एकमत झाले असून, येत्या २७ किंवा २८ फेब्रुवारीला औपचारिक आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेसने किमान समान कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावित ३९ कलमी अजेंडा स्वीकारला आहे, मात्र वंचित बहुजन आघाडीकडून जागांची मागणी अद्याप आलेली नाही.

वंचितने म्हटलं आहे की, किमान समान कार्यक्रमासाठी आमचा प्रस्तावित ३९ कलमी अजेंडा काँग्रेसने स्वीकारल्याचे आम्ही स्वागत करतो. आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना विनंती करतो की, त्यांनी किमान समान कार्यक्रमासाठी त्यांचे प्रस्ताव दाखवावे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप-आरएसएसच्या लोकशाही आणि जनताविरोधी सरकारपासून स्वत:ला वेगळे करण्यासाठी आणि आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने तिन्ही पक्षांच्या सूचनांसह किमान समान कार्यक्रम तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वंचितने आपल्या पत्रात म्हटलं आहे की, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दोन दिवसांच्या आत त्यांच्या जागांच्या वाटपांची माहिती दिली (डेडलाइन नाही पण आमच्या सोयीसाठी) तर आम्हाला निर्णय घेणे सोपे होईल. आम्ही तुम्हाला जागा वाटपासंदर्भात माहिती पुरवण्याची विनंती करतो, जेणेकरुन आम्हाला कोणासोबत बसायचे आहे, चर्चा करायची आहे हे ठरवता येईल. तसेच, आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजप-आरएसएसचा पराभव करण्यासाठी जागांची तडजोड करण्यास सोपं जाईल.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here