मुंबई : राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून उद्धवा अजब तुझे सरकार…असे ट्विट करत, दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता? असा सवाल केला आहे.
गाईच्या दूध दरवाढीसाठी सरकारविरोधात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी बारामतीत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला परवानगी नसल्याने करोना काळात नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमवल्याच्या आरोपावरून राजू शेट्टी व त्यांच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांविरोधात बारामती शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे राजू शेट्टींनी नाराजजी व्यक्त केली.
मोर्चामध्ये गाईचा छळ केला म्हणून माझ्यासह कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल करता. मग रेवनाथ काळे या राहुरीच्या शेतकऱ्याने दुधाला भाव नसल्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस जबाबदार असणा-या दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता? असं राजू शेट्टी यांनी ट्विट केलं आहे.
दूध उत्पादक शेतकरी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून, सातत्याने आंदोलन
“महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून, सातत्याने आंदोलन करत आहे. उत्पादन खर्चापेक्षा १५ रुपये कमी दराने तो दूध विकत आहे. त्यावेळी कुणाला दया आली नाही. अनेक दूध उत्पादकांनी दुधाचा धंदा परवडत नाही, म्हणून आत्महत्या केल्या. त्या आत्महत्यांना जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं पोलिसांना वाटलं नाही.
होय आम्ही गुन्हा केलेला आहे. पोलिसांना जे काय करायचं ते करावं
परवानगी नसताना मोर्चा काढला म्हणून जर का आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर होय आम्ही गुन्हा केलेला आहे. पोलिसांना जे काय करायचं ते करावं, सरकारला जे काय करायचं ते करावं. अजूनही आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत दूध उत्पादकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा कायदा हातात घेऊन आम्ही आंदोलन करणार.” असा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विटबरोबर जोडलेला आहे.