मुंबई : राज्यात (Maharashtra) बुधवारी सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीताचे गायन (National Anthem Singing) होणार असून नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उभं राहून या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, उद्या सकाळी ११ वाजता राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी सर्व संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय जारी केला असून सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्यावतीने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. तसेच हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असेही निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात उद्या, दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ या वेळेत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी केले आहे pic.twitter.com/MHUApknAnN— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 16, 2022
राज्यातील अंगणवाड्या, सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची विद्यापीठे, खासगी, शासकीय सर्व शैक्षणिक संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, सेवा पुरवठादार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच राज्यातील इतर सर्व नागरिक यांनी या उपक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.