मुंबई: इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर ‘मनाला’ झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar MLa) यांनी शिंदे गटाला (Shinde Group) लगावला आहे.
जाहिरातीवरून राजकारण तापले
शिंदेच्या शिवसेनेकडून मंगळवारी देण्यात आलेल्या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. ‘देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, अशी ही जाहिरात होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचे वर्चस्व दाखविण्यासाठी फडणवीसांना या जाहिरातीत स्थानच दिले नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यात फडणवीसांनी कानदुखीचे कारण देत एकनाथ शिंदेंसोबत कोल्हापूरला जाणेही टाळले होते. त्यामुळे या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरच रोहित पवारांनी आज ट्विट करून खोचक टोले लगावले आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर ‘मनाला’ झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी.
राज्यात गोंधळाचे वातावरण
रोहित पवार म्हणाले की, शिंदे सरकारने कामे केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळेच राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकार केवळ जाहिरातीतच
रोहित पवार म्हणाले, शिंदे गटाचे सरकार आल्यामुळे त्यांच्या काही नेत्यांना पदे मिळाली. पण, सामान्य नागरिक मात्र अडचणीत आला आहे. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत आहे. बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचे का?
शिंदेच्या शिवसेनेकडून मंगळवारी देण्यात आलेल्या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचे वर्चस्व दाखविण्यासाठी व फडणवीसांना दुय्यम स्थान त्या जाहिरातीत दिल्याने युतीत आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, तापलेल्या राजकारणावर पडदा टाकण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आज शिवसेनेकडून आपली चूक सुधारित जाहिरातबाजी करण्यात आली. दरम्यान, या प्रकारामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात चर्चांना सुरूवात झाली आहे.