मुंबई : कृषि विधेयकासंदर्भात शिवसेनेनं राज्यसभेत यू टर्न घेतला. लोकसभेत वेगळी आणि राज्यसभेत वेगळी भूमिका घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपानं शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत सेम टू शेम!”, असं म्हणत भाजपानं निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेला डिवचले
भाजपाचे नेते माजी मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केली आहे. “शिवसेनेनं सीएएचे लोकसभेत समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता. आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठिंबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग. केला
आशिष शेलार ट्विटरवर म्हणाले
महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत ‘सेम टू शेम!’ गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!!”, असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर त्यांच्या परस्परविरोधी भूमिकेवरून टीका केली आहे.
शिवसेनेचा लोकसभेत पाठिंबा तर राज्यसभेत विरोध
शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार ही विधेयके रविवारी राज्यसभेत मंजूर झाली. ही विधेयके लोकसभेत आधीच मंजूर झाल्याने कायद्यात रूपांतर होण्यासाठी ती स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली जाणार आहेत. मात्र, या विधेयकासंदर्भात शिवसेनेनं संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्यानं भाजपानं प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला आहे.
मोदी सरकारनं कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली. लोकसभेत तिन्ही विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर दोन विधेयके रविवारी राज्यसभेत मांडण्यात आली. यावेळी लोकसभेत या विधेयकांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग केला. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपने टीका केली आहे.