औरंगाबाद : टिक टॉक स्टार ‘बिनधास्त काव्या’ गायब झाल्याची घटना समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली हाेती. काव्या आणि तिच्या कुटुंबाने फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा खटाटोप केला. कारण विविध समाजमाध्यमांवर फॅनकडून जेवढा प्रतिसाद मिळतो त्या प्रमाणात अर्थार्जन होते. त्यामुळे अशा खालच्या पातळीवर जाऊन दर्जाहीन प्रसिद्धीसाठी असे कृत्य केल्याची माहिती बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा अॅड. आशा शेरखाने-कटके यांनी दिली.
विविध समाजमाध्यमांवर पाच मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलोअर्स असलेली काव्या बिनधास्त ९ सप्टेंबर २०२२ रोजी अचानक गायब झाली. तिच्या आई-वडिलांनी मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. ती आपला फोन घरीच विसरल्याचे सांगितले. दुसरीकडे तिचा फोन लॉक असूनही आई-वडिलांनी उघडला. व्हिडिओ करून पुन्हा समाजमाध्यमांवर भावनिक साद घातली. दोघेही नाटक केल्यासारखे रडताना दिसले. काव्या मध्य प्रदेशच्या इटारसी स्टेशनवर सापडली होती.
आई-वडिल दोषी : इटारसी स्थानकावर काव्या पोहाेचताच पाठोपाठ तेथे पोलिस व आई-वडील हजर झाले. मुलगी सज्ञान नसताना तिचे व्हिडिओ आणि छायाचित्र शेअर करून माहिती दिली. इटारसीच्या पोलिसांनी तेथील बाल न्याय मंडळासमोर तिला हजर करणे कायद्यानुसार बंधनकारक होते. सर्व बाबींना फाटा देत तिला पोलिस सरळ औरंगाबादला घेऊन आले आणि आई-वडिलांच्या ताब्यात दिले. केवळ पैशांसाठी हा प्रकार केल्याचे सिद्ध झाले. यामुळे तिच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
दर्जाहीन प्रसिद्धीसाठी शासकीय यंत्रणा वेठीस धरली
दर्जाहीन प्रसिद्धीसाठी पोलिस, रेल्वे, बाल न्याय मंडळ आदी यंत्रणांना वेठीस धरले गेले. सर्व घटनाक्रम पूर्वनियोजित होता असे स्पष्ट होते. गायब होणे, पाठोपाठ पोलिस, नातेवाईक आणि मीडिया पेाहाेचल्याने शंका आली हाेती. नागरिकांना भावनाविवश करून लाइक करण्यास भाग पाडले. दर्जाहीन प्रसिद्धीसाठी यंत्रणेस वेठीस धरणे याेग्य नाही.
– अॅड. आशा शेरखाने-कटके, अध्यक्ष बाल न्याय मंडळ, औरंगाबाद.