मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच असून शनिवारीही रुग्णवाढीने नवा उच्चांक नोंदवला. दिवसभरात 20 हजार 489 नवे रुग्ण आढळले, तर 312 मृत्यूंची नोंद करण्यात आली. यामुळे राज्यातील संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता 8 लाख 83 हजार 862, तर बळींचा आकडा 26,276 वर गेला आहे. राज्यात सध्या 2 लाख 20 हजार 661 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 6,36,574 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रासाठी पुढचे तीन महिने धोक्याचे – मुख्यमंत्री
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबई महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक आणि अधिष्ठाता यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रासाठी पुढचे तीन महिने धोक्याचे असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. लोकांनीही निष्काळजीपणा न दाखवता जागरूक राहावे. त्यामुळे कोरोनाचे संकट आपण रोखू शकतो असे मतही त्यांनी व्यक्त केले.