मुंबई: महाराष्ट्र सध्या कोरोना महामारीच्या मोठ्या संकटात आहे. राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर मोठ्या ताकदीने काम करत असताना राज्यातील विरोधी पक्ष मात्र बेजबाबदारपणे वागत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra fadnavis यांनी सरकारला लक्ष्य करताना पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या पॅकेजची आकडेवारी देत राज्य सरकारच्या मदतीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला या कठीण परिस्थितीत किती मदत केली हे फडणवीस यांनी सांगायला हवे होते, अशी विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, ‘ मागील वर्षभरापासून महाराष्ट्र विविध संकटाचा सामना करत आहे. कोरोना महामारी, चक्रिवादळ, अतिवृष्टी, विदर्भातील पूरस्थिती अशी संकटाची मालिकाच सुरू आहे. अशा परिस्थितीतही मविआ सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी नेहमी तत्पर राहिले आहे.
हेही वाचा: बघा तुमचं वजन वापरून काही मिळतं का?; फडणवीसांना आव्हाडांचा टोला
कोरोनामुळे माझ्यासमोर आर्थिक संकट असतानाही जनतेच्या हितासाठी सरकारने कधीही हात आखडता घेतला नाही. परंतु दुर्दैवाने केंद्रातील मोदी सरकारने नेहमीच महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली. राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा तसेच इतर निधीही देण्यास टाळाटाळ केली.
भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून देशात बदनामी केली…
राज्य संकटात असताना राज्यातील भाजपाचे नेते मात्र मविआ सरकारविरोधात कटकारस्थाने करत राहीले. कधी राजभवनच्या माध्यमातून, कधी काही अधिका-यांना हाताशी धरून षडयंत्र रचण्यातच ते मग्न राहिले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून देशात बदनामी केली.
राज्याला आर्थिक मदतीची गरज असताना मुख्यमंत्री मदतनिधीत पैसे जमा न करता राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान केअर फंडात पैसे जमा केले. राज्य सरकारला पॅकेज संदर्भात विचारणा करणारे देवेंद्र फडणवीस व भाजपा नेते यांनी नरेंद्र मोदी सरकारकडून महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी काय केले ?
फडणवीसांना दिल्लीत मोदी- शहा गांभीर्याने घेत नाहीत म्हणून ते…
मोदींनी जाहीर केलेल्या त्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले ? या 20 लाख कोटी रुपयांतून महाराष्ट्राला किती कोटी मिळाले? याची उत्तरे त्यांनी जनतेला द्यावीत. फडणवीस यांची मागणी रास्तच आहे पण त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे विचारणा करणे अपेक्षित आहे. कदाचित त्यांना दिल्लीत मोदी- शहा गांभीर्याने घेत नाहीत म्हणून ते राज्य सरकारच्या नावावर मोदींना सुचवत असावेत, अशी कोपरखळीही पटोले यांनी मारली.
कोरोना संकटात भरीव उपाययोजना करण्याचे सोडून देशातील जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्याचे आवाहन करण्यापलिकडे केंद्रातील भाजपाच्या सरकारने काय केले? कसलीही तयारी न करता अचानक लॉकडाऊन लावून अख्या देशाला अंधारात ढकलून दिले. लाखो लोकांनी पायपीट करत गावाचा रस्ता धरला, त्यावेळी अनेकांनी रस्त्यातच जीव सोडला.
सामान्य जनतेला आगीच्या खाईत लोटून देण्याचे पाप भाजपाने केले…
सामान्य जनतेला आगीच्या खाईत लोटून देण्याचे पाप भाजपाने केले. लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले. सामान्य जनतेला किती मरण यातना दिल्या हे जगाने पाहिले. पॅकेजच्या नावाखाली फक्त मोठ्या आकड्यांची जुमलेबाजी केली. देशाला देशोधडीला लावले त्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.