मुंबई : सुशांत प्रकरणाआड “महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?,” अशी विचारणाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी. अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
अशी मागणी अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली. पुढे ते म्हणाले की, “बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. आता ते राजकारणात गेले आहेत. बिहारमधून ते निवडणूक लढत असताना महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस बिहारचे प्रभारी आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे ज्यांनी महाराष्ट्र, मुंबई पोलीस यांची बदनामी केली त्यांच्या प्रचाराला जाणार का?” .
“एम्सचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा रिपोर्ट पाहिला तर त्यात कुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. या संपूर्ण केसची चौकशी सीबीआयच्या माध्यमातू सुरु आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट येईल तेव्हा त्यात काय असेल याची सर्वजण वाट पाहत आहेत. लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी आमची विनंती आहे. यामुळे सुशांतची हत्या होती की आत्महत्या हेदेखील स्पष्ट होईल,” असं यावेळी अनिल देशमुख यांनी म्हटलं.
“महाराष्ट्र पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत भाजपाच्या नेत्यांची मजल गेली
अनिल देशमुख यांनी यावेळी सुशांत मृत्यू प्रकरणावर अमेरिकेतील विद्यापीठाने तयार केलेला रिपोर्टचा दाखला दिला. “रिपोर्टमध्ये सुशांत प्रकरण एका राजकीय पक्षाने वेगळ्या दिशेने नेलं असून, प्रसारमाध्यमांकडून मोठं करण्यात आलं असं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. “एका पक्षाने सुपारी घेतली होती,” असा आरोप यावेळी त्यांनी नाव न घेता केला. “महाराष्ट्र पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत भाजपाच्या नेत्यांची मजल गेली होती,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता असं म्हटलं होतं
“ज्यांनी पाच वर्ष मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता असं म्हटलं होतं. संपूर्ण महाराष्ट्र करोनाविरोधात युद्ध लढत असताना महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचण्यात आलं. महाराष्ट्राला बदनाम करण्यात आलं. त्याच्याही पुढे जाऊन जे बाहेरचे आहेत पण महाराष्ट्रात वास्तव्य करत आहेत अशा बाहुलीलाही आपल्या तालावर नाचवण्याचं काम या पक्षाने केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यानिमित्ताने बदनाम झाला आहे,” अशी टीका अनिल देशमुखांनी केली.
वाचा : धक्कादायक सुशांत प्रकरणात 80 हजार फेकअकाऊंसव्दारे मुंबई पोलिसांची बदनामी