मुंबई l परतीच्या पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचं मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उद्या रविवारपासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.
शरद पवार दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर असणार आहेत. 18 आणि 19 ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे शरद पवार भेट देणार असून पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.
“राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गाफील राहू नका. प्राणहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा,” असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले. बाधितांना तातडीने मदत द्या तसेच झालेल्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या.
राज्याच्या काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील चार दिवसात पुन्हा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून पूरस्थितीचा आढावा घेतला.
वाचा l ‘विवेक ओबेरॉय भाजपच्या गोटातला, पण आता काय घडले?;शिवसेनेचा खोचक सवाल
राज्यभरात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. “गेल्या ३-४ दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून तो मदतीसाठी आर्जव करीत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकर्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलिकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकर्यांना मदत तर मिळतच नाही. अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी उध्दव ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
[…] शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्याव… […]