औरंगाबाद: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार असून यावेळी ते काय बोलतात याची सर्वांना उत्सुक्ता लागलेली आहे. महाराष्ट्राला उत्सुकता आहे. मात्र राज ठाकरेंच्या सभेआधीच शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका करयाला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrkant khaire) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी कोणीही बरोबरी करू नये असा टोला राज ठाकरेंना लगावला आहे. तसंच सभेसाठी पैसे देऊन लोकांना बोलावलं जात आहे असा आरोप केला आहे.
“औरंगाबाद हा शिवसेनेचा गड असून हा गड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला आहे. शिवसेनेचं पानिपत करण्याची हिंमत कोणामध्येच नाही, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कोणीही बरोबरी करू नये,” असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
मनसेच्या सभेवर टीका करताना ते म्हणाले की, “राज ठाकरे यांच्या सभेसाठी भाजपा मदत करत आहे. या सभेसाठी नागरिकांना पैसे देऊन सभा ऐकण्यासाठी बोलवण्यात येत आहे”.“राज ठाकरे यांच्या सभेला कितीही नागरिक आले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. कारण औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील,” असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
भीम आर्मीचा इशारा…!
पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या १६ अटींचं उल्लंघन राज ठाकरेंनी केलं तर सभा बंद पाडण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. आज राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला दाखल होणार असून राज ठाकरेंना भारतीय संविधान भेट देणार असल्याची माहिती भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिली आहे.