मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज पुन्हा धार्मिक स्थळांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. आपण अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरु केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे, असं उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
इतर देश फक्त कोविड एके कोविडचा मुकाबला करताहेत. आपलं तसं नाही. आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला, आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पावसाळा सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा आपल्यासाठी कसोटीचा काळ आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
सध्या देशात राज्यात कोरोनाचा कहर सुरुचं आहे. मात्र विरोधकांनी कोरोना काळात धार्मिक स्थळं उघडण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. अनेक राज्यांनी धार्मिक स्थळं उघडली तरी महाराष्ट्रात धार्मिक स्थळं का उघडली जात नाही असा सवालही विरोधकांकडून करण्यात आला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. लॉकडाउमध्ये धार्मिक स्थळंही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळं बंद आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर येथीळ कोविड उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी यावर भाष्य केलं.
मुख्यमंत्र्यांनी ‘या’ केल्या सूचना
कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल पण कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचं पालन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.