मुंबई: देशातील सत्ताधारी पक्ष आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरात दंगल घडवण्याच्या विचारात असल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी केला. या प्रकरणी विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सल्लामसलत होणार असल्याचेही ते म्हणाले.
अयोध्येतील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी 2024 पर्यंत या मंदिराचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भाजप राम मंदिराच्या उद्घाटनावेळी मोठा हल्ला घडवू शकतो असा दावा केला आहे. संजय राऊत यांनी मंगळवारी त्यांचा हा दावा अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत या प्रकरणी विरोधी पक्ष सावध असल्याचे स्पष्ट केले.
देशात दंगली घडवण्याचा डाव
देशात अनेक प्रश्न आहेत. पण भाजप केवळ धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुकांना सामोरे जाण्याचा एककलमी अजेंडा राबवत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून रेल्वे अयोध्येला बोलावून त्यापैकी एखाद्या रेल्वेवर हल्ला घडवला जाईल. त्यानंतर देशात धर्मांधतेचा आगडोंब उसळवला जाईल, अशी भीती सर्वच राजकीय पक्षांना वाटत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
विरोधक अत्यंत सावध
या लोकांनी गोध्रा घडवल्याचे सांगितले जाते. पुलवामा हल्ल्यावर संशय व्यक्त केला जातो. त्यानुसार 2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून असे प्रकार केले जाऊ शकतात. या मुद्यावर इंडियाच्या बैठकीत चर्चा होईल. जनतेलाही अशी भीती वाटत आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत सावध आहोत, असे राऊत म्हणाले.
बाबरीचा मुद्दा काढणारा मूर्ख
बाबरी – अयोध्येचा मुद्दा संपला आहे. आता हा मुद्दा कुणी काढत असेल, तर तो मूर्ख आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा संपवला म्हणूनच तिथे राम मंदिर बांधल्या जात आहे. त्याचे श्रेय कुणीही घेण्याचा प्रयत्न करू नये. त्याचे श्रेय कुणाला द्यायचे असेल, तर ते आपले बलिदान देणार्या हजारो कारसेवकांना द्यावे लागेल. यात शिवसेनेचाही समावेश आहे, असे संजय राऊत म्हणाले.
पुलवामा हल्ला घडवला गेला
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ला घडवण्यात आल्याचा दावा केला. गोध्रा दंगलीविषयीही असेच म्हटले जाते, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.