मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले होते. आता पुन्हा माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) यांनी महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पावरून सरकारला लक्ष्य केलं आहे.
आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत सरकरावर टीका केली आहे. “एका जागतिक संस्थेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालाप्रमाणे भारतातल्या बेरोजगारीचा टक्का ८.११% वर गेला आहे. शहरी भागात तर तो ९.८१% इतका वाढला आहे”, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी ट्वीटद्वारे दिली.
एका जागतिक संस्थेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालाप्रमाणे भारतातल्या बेरोजगारीचा टक्का ८.११% वर गेला आहे. शहरी भागात तर तो ९.८१% इतका वाढला आहे.
ह्या सगळ्यात महाराष्ट्रात आलेलं अवकाळी सरकार मात्र महाराष्ट्रातले उद्योग बाहेर धाडण्यात पटाईत आहे. बल्क ड्रग पार्क, वेदांता…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 4, 2023
बेरोजगारीच्या मुद्द्यावरून त्यांनी महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पांवरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, “ह्या सगळ्यात महाराष्ट्रात आलेलं अवकाळी सरकार मात्र महाराष्ट्रातले उद्योग बाहेर धाडण्यात पटाईत आहे. बल्क ड्रग पार्क, वेदांता फॉक्सकॉन, एयरबस – टाटा प्रकल्प ह्यासारखे महाराष्ट्राच्या युवकांना रोजगार मिळवून देणारे मेगा प्रकल्प शेजारच्या राज्यात घालवले गेले. त्यामुळेच महाराष्ट्रासाठी ही परिस्थिती जास्त चिंताजनक झाली आहे. ह्यावर युवकांनी संघटीत होऊन आवाज उठवायला हवा!”
दरम्यान, राज्यातील अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने विरोधकांनी सरकारवर शरसंधान साधलं होतं. हे प्रकल्प महाराष्ट्रात येण्याकरता प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतरच हे प्रकल्प बाहेर गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंसह अनेक नेत्यांनी केला होता. त्यानंतर, आता पुन्हा त्यांनी हा मुद्दा छेडला आहे.