औरंगाबाद:रिक्षाचालकांनी मीटर अद्ययावतीकरण (कॅलिब्रेशन) साठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदतवाढ बुधवार (३० नोव्हेंबर) रोजी संपली. रिक्षा संघटनांनी २८ मार्चपर्यंत मुदतवाढीची मागणी केली होती. ती मागणी प्रादेशिक परिवहन विभागाने फेटाळल्यामुळे रिक्षा चालक संयुक्त कृतीने आजपासून बेमुदत रिक्षा बंद केल्या. या बंदचा फटका विद्यार्थी,रुग्ण,चाकरणान्यांना बसला. काही ठिकाणी रिक्षा संघटनांनी प्रवासी वाहतूक करणार-या रिक्षा,सिटीबसला रोखले. यामुळे किरकोळ वाद निर्माण झाले. रिक्षा बंद असल्यामुळे ठिकठिकाणी प्रवाशी वाहनांच्या प्रतिक्षेत दिसून आले.
औरंगाबादेत २ ऑक्टोबरपासून रिक्षाची भाडेवाढ लागू करण्यात आली. रिक्षात बसताच पहिल्या दीड कि.मी. अंतरासाठी २६ रुपये मोजावे लागत आहेत. रिक्षाचालकांनी मीटर अद्ययावतीकरण (कॅलिब्रेशन) साठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदतवाढ बुधवार (३० नोव्हेंबर) रोजी संपली. आज गुरुवार १ डिसेंबरपासून रिक्षा तपासणीची मोहिम राबवण्यात येणार होती. नवीन दरानुसार मीटर कार्यरत नसलेल्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असा इशारा प्रादेशिक परिवह विभागाने दिला होता. मात्र, रिक्षा संघटनांनी २८ मार्चपर्यंत मुदतवाढीची मागणी केली होती. प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी बुधवारी रिक्षा संघटनांची बैठक घेतली होती. मार्च पर्यंत मुदतवाढ मिळणार नाही असे सांगून ३१ डिसेंबरपर्यंत मीटर कॅलिब्रेशनसाठी वेळ दिला. ही मागणी मान्य नसल्यामुळे रिक्षा संघटनांनी बेमुदत रिक्षा बंदचे हत्यार उपसले.
रिक्षा तपासणी मोहीम सुरुच राहणार…रिक्षा तपासणीची मोहीम सुरुच राहणार आहे. रिक्षा संघटनांना मागणीनुसार ३१ डिसेंबरपर्यंत मीटर कॅलिब्रेशनसाठी वेळ दिला आहे. बुधावारी विविध रिक्षा संघटनांच्या पदाधिका-यांशी चर्चा केली. यामध्ये त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. परंतु नियम तोडणा-या रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी
आम्हाला २८ मार्च पर्यंत मुदतवाढ हवी….रिक्षांचे इन्शुरन्स, पीयुसी, टॅक्स,मीटर कॅलिब्रेशन, फिटनेस, वाहन पासिंग करण्यासाठी २८ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ मिळाली तर सर्वांना आधार मिळेल. रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल होत असल्यामुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या कृती समितीच्या वतीने गुरुवारपासून बेमुदत बंद राहिल.सलिम खामगांवकर, अध्यक्ष रिक्षा चालक-मालक कृती समिती
या रिक्षा संघटनांचा बंदमध्ये सहभाग…बहुजन हिताय रिक्षा चालक, शिव वाहतूक सेना, वस्ताद वाहतूक दल, रोशन ऑटो युनियन, अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी रिक्षा चालक-मालक संघटना, वाय.एफ.खान रिक्षा संघटना, परिवर्तन ऑटो चालक-मालक संघटना, महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना, काँग्रेस रिक्षा युनियन, पँथर पॉवर रिक्षा चालक-मालक संघटना, महाराष्ट्र वाहतूक सेना, मराठा मावळा संघटना, रिपाइं चालक- मालक संघटनांचा बंदमध्ये सहभाग असणार आहे.
आमचा बंदमध्ये सहभाग नाही…रिक्षा संघटनांची बुधवारी दुपारी प्रादेशिक परिवहन अधिका-यांसोबत बैठक झाली. या बैठकीत रिक्षा चालकांना मीटर कॅलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मार्चपर्यंत मुदतवाढ मागितली होती. आमचा बंदमध्ये सहभाग नाही.निसार अहेमद खान, अध्यक्ष, रिक्षा चालक मालक संयुक्त संघर्ष समिती
रिक्षाचा संप, सिटीबसच्या पथ्थ्यावर, 45 हजार प्रवाशांनी केला प्रवास :शहरातील रिक्षा चालकांनी गुरुवारी पुकारलेल्या संपाचा पार्श्भूमीवर नागरिकांनी मोठ्या संख्येने सिटीबसचा लाभ घेतला. 28 मार्गावर 70 बसेस धावल्या असून जवळपास 45,000 प्रवाशांची सिटीबसने प्रवास केला. त्यातून सिटीबसला अंदाजे दहा लाख रुपयाचे उत्पन्न होण्याची शक्यता स्मार्ट सिटी शहर बस विभागाने व्यक्त केली. सर्व भागातून सिटीबस प्रवाश्यांनी खच्चून भरुन धावत असल्याचे दिसून आले.
शहरातील रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी संप पुकारला होता. रिक्षाचालक संपावर गेल्यामुळे रस्त्यावर कुठेही रिक्षा प्रवाश्यांना घेऊन धावताना दिसून आली नाही. त्यामुळे प्रवाश्यांना सिटीबस शिवाय पर्याय नव्हता. सिटीबसच्या बसस्थानकावर प्रवाश्यांची गर्दी दिसून आली. स्मार्ट सिटीकडून शहरातील 28 मार्गावर 70 सिटीबस सुरू केल्या आहेत. सिटीबसला दररोज साडेपाच ते सहा लाख रुपयाचे उत्पन्न मिळते व 22 ते 23 हजार प्रवाशी सिटीबसचा लाभ घेत होते.
हेही वाचा: Auto rickshaw Strike in Aurangabad :औरंगाबादेत बेमुदत रिक्षा बंद,संघटनांमध्ये फूट!
गुरूवारी मात्र रिक्षाच्या संपामुळे सिटीबसला प्रवाश्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सिटीबस व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात सिटीबसने जवळपास 45 हजार प्रवाश्यांची प्रवास केला असून त्यांच्या तिकीटातून अंदाजे दहा लाख रुपयाचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. सिटीबसला सर्वच मार्गावर प्रवाश्यांची प्रतिसाद दिला. सिटीबस प्रवाश्यांनी खच्चून भरून धावल्या. लवकरच आणखी 20 बसेस धावण्याबद्दलचे नियोजन केले जात असून 90 सिटीबस पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरणार.